बटन ऑफ करा म्हणजे संजय राऊत शांत होतील. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये घोटाळ्याच्या आरोपावरून सामना रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत विरुद्ध भाजप असा सामना रंगताना पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूडाचे राजकारण हे हिंदुत्व नाही असं म्हणत भाजपवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.
पाटील म्हणाले, माझा अंदाज आहे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली आहे. राजकारण गढूळ झालंय असं वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर संजय राऊतांना आता शांत बसवावे. बटन ऑफ करून संजय राऊत यांना शांत करावं, आपोआप सगळं शांत होईल, असं पाटील म्हणाले. असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवला मार्ग आहे.
चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मित्र असा केला. ‘उद्धवजी काहीही झालं तरी आमचे मित्र आहेत. ते मानोत न मानोत काहीही झालं तरी एकतर्फी मैत्री आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय. कोण संजय राऊत ओ? काल परवा आले शिवसेनेत आणि ते कोणाला शिकवताय?,’ असा टोला त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना लगावला. संजय राऊत यांना आवरावं, अशी विनंती उद्धव ठाकरेंना केली होती. त्यावरून संजय राऊतांनी “आम्हाला ज्ञान शिकवू नका,” प्रत्युत्तर पाटलांना दिलं. राऊतांनी केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिलं.
नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हा सगळा ऍक्शन रिऍक्शनचा खेळ सुरू आहे. बघू कोण यात टिकतं, राणे समर्थ आहेत, भाजप त्यांच्यासोबत आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.